सरकारचं कसं चाललंय? गुलाबराव पाटील म्हणतात, वर भाजप, कंबर शिवसेनेचे आणि हातपाय…
राज्यातील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. राष्ट्रवादीवाले आम्हाला खोके खोके म्हणून चिडवत होते. आता तेच गप्प आहेत, असा हल्लाच गुलाबराव पाटील यांनी चढवला.
![सरकारचं कसं चाललंय? गुलाबराव पाटील म्हणतात, वर भाजप, कंबर शिवसेनेचे आणि हातपाय... सरकारचं कसं चाललंय? गुलाबराव पाटील म्हणतात, वर भाजप, कंबर शिवसेनेचे आणि हातपाय...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/gulabrao-patil-58.jpg?w=1280)
जळगाव | 28 ऑगस्ट 2023 : शिंदे गट आणि भाजपने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांना अजितदादा गटाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सत्तेत आता एकूण तीन पक्ष झाले आहेत. तीन पक्षाचं राज्यात सरकार सुरू आहे. मात्र, हे सरकार कसं आहे? या सरकारची युती कशी आहे? यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी या सरकारचं अचूक आणि मार्मिक शब्दात वर्णन केलं आहे. वर भाजप, कंबर शिवसेनेचे आणि हातपाय राष्ट्रवादीचे असं चाललंय आमचं, अशी तुफान फटकेबाजी गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
जळगाव येथील बादली येथील विविध विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी गुलाबराव पाटील यांनी आपल्या अनोख्या शैलीतून तुफान फटकेबाजी केली. तुम्ही मंत्री असताना तरी एकच सरकार होते. मात्र आमचं तीनजणांचे सरकार आहे. वरती भाजप, कंबर शिवसेनेचे आणि हातपाय राष्ट्रवादीचे असं चाललं आहे आमचं, अशी मार्मिक टिप्पणी गुलाबराव पाटील यांनी केली.
आता बोलती बंद झाली
आधी हेच राष्ट्रवादीवाले आमच्यावर 50 खोके एकदम ओके म्हणून टीका करत होते. आता अजितदादा आमच्याकडे आले तर यांची बोलती बंद झाली. यांचे आता तोंड उघडत नाही, अशी जोरदार टीकाही गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर केली.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/ajit-pawar-latest.jpeg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/Vikas-Malu.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/cm-eknath-shinde-2023-08-25T074646.290.jpg)
राष्ट्रवादीला आव्हान
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या अनिल भाईदास पाटील यांचा या संबंधितांनी सत्कार केला. आणि हे स्वतःला शरद पवार गटात असल्याचं दाखवतात. हे कसले शरद पवार गटात? आदेश शरद पवारांचे की अजित पवारांचे हे सिद्ध करा? असं आव्हानच त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले.
ते स्टेबल नाहीत
अनिल दादांचा सत्कार करणारे पण तुम्हीच. शरद पवार जिंदाबाद म्हणणारे पण तुम्हीच आणि विरोध करणारे पण तुम्हीच. हे लोक स्टेबेल नाहीयेत. मात्र आम्हीच स्टेबेल आहोत. एक वर्षभर आमच्यावर गद्दार गद्दार म्हणून टीका झाली. आम्ही ते ऐकले. आम्ही काम करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
जनता कलाकार आहे
तुम्ही मत दिलं तर मी निवडून येईल. नाहीतर माझ्यात निवडून येण्याची ताकद नाही. जनताच माय आहे आणि जनताच बाप आहे. जळगाव तालुक्यातील जनतेने साथ दिली नसती तर मी आमदार झालो असतो. जनता सकाळी काँग्रेसचे जेवण करते, दुपारी भाजपचं तर रात्री शिवसेनेचं. हे लोक तर हुशार आहेत. लोक खूप कलाकार आहेत, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.