मोठी बातमी! नालासोपाऱ्यात 4 मजली इमारत झुकली, दोन इमारतीमधील 50 कुटुंबांचं रेस्क्यू ऑपरेशन
नालासोपाऱ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नालासोपारा पूर्व हनुमान नगरमध्ये एक 4 मजली इमारत कलंडली आहे. संबंधित घटनेची पालिका प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आलीय.
![मोठी बातमी! नालासोपाऱ्यात 4 मजली इमारत झुकली, दोन इमारतीमधील 50 कुटुंबांचं रेस्क्यू ऑपरेशन मोठी बातमी! नालासोपाऱ्यात 4 मजली इमारत झुकली, दोन इमारतीमधील 50 कुटुंबांचं रेस्क्यू ऑपरेशन](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/07/26021054/nalasopara-building.jpeg?w=1280)
नालासोपारा | 25 जुलै 2023 : ठाणे, पालघर, रायगड, मुंबईसह उपनगरात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईपेक्षा ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये पाऊस जास्त पडतोय. या मुसळधार पावसामुळे आता काही घटना समोर येऊ लागल्या आहेत. मुसळधार पावसामुळे रायगडच्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर आता नालासोपाऱ्यात एक चार मजली इमारत कलंडली (झुकली) आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या इमारतीत तब्बल 16 कुटुंब वास्तव्यास होते. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तातडीने प्रशासनाला देण्यात आली.
संबंधित घटना ही नालासोपारा पश्चिम हनुमान नगर परिसरात घडली. हनुमान नगरच्या समर्थ नगर येथील जैनम अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत कलंडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. खरंतर या इमारतीला महापालिकेने याआधीच अतिधोकादायक म्हणून घोषित केलं होतं. पण तरीही 16 कुटुंब तिथे वास्तव्यास होते. संबंधित घटना समोर आल्यानंतर लगेच पालिकेचे कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी बचाव कार्यासाठी दाखल झाले. त्यांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं.
बाजूच्या जलाराम कुंज इमारतीमधील 35 कुटुंबही सुरक्षितस्थळी हलवले
प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, पालिका कर्मचारी आणि पोलीस यांच्या मदतीने इमारतीमधील 16 कुटुंबांचं रेस्क्यू ऑपरेशन करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. इमारतीच्या पिलरला पूर्णपणे तडे गेले असून ती कधीही कोसळू शकते. कलंडलेली इमारत पडताना कोणत्याही दुसऱ्या इमारतीला धोका निर्माण होऊ नये यासाठी बाजूच्या जलाराम कुंज इमारतीमधील 35 कुटुंबही स्थलांतर करण्यात आले आहेत.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/07/26015031/suresh-dhas-vp-chunk-.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/07/26005905/yashomati-thakur-and-ajit-pawar.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/07/25235520/rahul-narvekar-2.jpg)
घटनेची सविस्तर माहिती, नेमकं काय घडलं?
नालासोपारा पश्चिम हनुमान नगर परिसरातील समर्थ नगरमधील जैनम अपार्टमेंट नावाच्या इमारतीला मागच्या तीन दिवसांपासून तडे जायला सुरवात झाली होती. आज सायंकाळच्या सुमारास इमारतीच्या पिलरला जास्तीचे तडे गेल्याचे लक्षात आल्यावर ही इमारत कधीही कोसळण्याची भीती होती. ही बातमी पालिका प्रशासनाला कळताच तात्काळ त्यांनी सर्व यंत्र सामुग्रीसह घटनास्थळावर पोहचून, जैनम इमारतीमधील 16 आणि बाजूच्या जलाराम कुंज इमारतीमधील 35 असे 51 कुटुंब रेस्क्यू करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
या इमारतीला दोन वर्षांपासून अतिधोकादायक असल्याची नोटीस दिली होती. पण रहिवाशी बाहेर निघत नव्हते. आज ही इमारत कोसळण्याच्या स्थितीत असल्याने आम्ही तात्काळ सर्वांना बाहेर काढून ही इमारत रात्रीतूनच आम्ही डीमोलिश करणार आहोत, अशी प्रतिक्रिया वसई विरार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख किशोर गवस यांनी सांगितले.
या इमारतीचा कार्यकाळ संपला आहे यामुळे ही इमारत एकबाजुला झुकली आहे. तत्काल या इमारतीला जमीनदोस्त करणार आहोत. सध्या 20 जणांची टीम हजर आहे. कोणतीही जीवितहानी होणार नाही, याची काळजी घेणार आहोत, असे NDRF टीमचे प्रमुख ईश्वरदास मते यांनी सांगितले आहे.