मित्राच्या लग्नाला चालले होते, पण वाटेतच काळाने घाला घातला अन् तीन मित्र…
मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी चार मित्र चालले होते. पण मित्राच्या लग्नात सहभागी होऊन मजा करण्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
![मित्राच्या लग्नाला चालले होते, पण वाटेतच काळाने घाला घातला अन् तीन मित्र... मित्राच्या लग्नाला चालले होते, पण वाटेतच काळाने घाला घातला अन् तीन मित्र...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/23181320/beed-accident-1.jpg?w=1280)
बीड : मित्राचे लग्न होते. चार मित्र मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी चौघे मित्र नगरहून बीडला चालले होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. बीड जिल्ह्यात प्रवेश केला पण मित्राच्या घरापर्यंत पोहचण्याआधीच काळाने घाला घातला. बीडच्या घोसापुरी शिवारात पहाटेच्या सुमारास कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. या भीषण अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचाही चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
महामार्ग वाहतूक पीएसआय घोडके, रवींद्र नागरगोजे, बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे लक्ष्मण जायभाये, रवी सानप तसेच महामार्ग पेट्रोलिंग टीमचे प्रमुख प्रतीक कदम, सुनील कवडे, राम गायकवाड तसेच महामार्ग रुग्णवाहिका डॉक्टर विशाल डोंगर, यशवंत शिंदे, ड्रायव्हर सुभाष नन्नवरे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
गाडीवरील नियंत्रण सुटले अन् घात झाला
धीरज गुंदेजा, रोहन वाल्हेकर, विवेक काणगुणे अशी मयत तरुणांची नावे आहेत, तर आनंद वाघ असे जखमीचे नाव आहे. कारमधील चौघेजण अमहदनगरमधील नेवासा येथील रहिवासी आहेत. हे चौघेजण मारुती सुझुकी कारने बीडला मित्राच्या लग्नाला चालले होते. मध्यरात्री 2.15 वाजण्याच्या सुमारास पेंडगावजवळ घोसापुरी शिवारात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यानंतर गाडी रोडच्या बाजूला पलटी झाली. तरुणांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.