Ratnagiri Crime : लग्नाची बोलणी करायला आलेल्या जावयावर सासऱ्याचा हल्ला, कारण काय?
लग्नाची बोलणी करायला तरुण होणाऱ्या सासरवाडीत गेला होता. यावेळी सासरा आणि जावयामध्ये वाद झाला. मग जे घडलं ते धक्कादायक.
![Ratnagiri Crime : लग्नाची बोलणी करायला आलेल्या जावयावर सासऱ्याचा हल्ला, कारण काय? Ratnagiri Crime : लग्नाची बोलणी करायला आलेल्या जावयावर सासऱ्याचा हल्ला, कारण काय?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/05154032/crime-1-2.jpg?w=1280)
रत्नागिरी / 9 ऑगस्ट 2023 : लग्नाची बोलणी करायला गेलेल्या तरुणावर होणाऱ्या सासऱ्याने हल्ला केल्याची घटना रत्नागिरीतील लांजा तालुक्यात घडली. बोलणी सुरु असताना जावई आणि सासऱ्यामध्ये वाद झाला. मग हा वाद विकोपाला गेला आणि संतप्त सासऱ्याने जावयावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात जावई जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत. याप्रकरणी जखमी तरुणाच्या फिर्यादीवरुन लांजा पोलिसात भा.द.वि. कलम 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एन.एस. नावलेकर करत आहेत. राजेश चव्हाण असे जखमी तरुणाचे नाव आहे, तर सुरेश पडये असे आरोपीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी सुरेश पडये याच्या घटस्फोटीत मुलीचे पीडित राजेशसोबत लग्न जमले होते. दोघांमध्ये लग्नाची बोलणी सुरु होती. याच संदर्भात बोलण्यासाठी राजेश 7 ऑगस्ट रोजी पुन्हा कुर्णे पडयेवाडी येथे सुरेश पडये याच्या घरी गेला होता. दोघांमध्ये लग्नाची बोलणी सुरु असतानाच काही कारणातून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात पडयेने घरातील कोयता आणून राजेशच्या डोक्यावर वार केले. यात राजेशच्या डोक्याला पाच टाके पडले.
जखमी राजेशने लांजा पोलीस ठाणे गाठत पडयेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी राजेशच्या फिर्यादीवरुन पडयेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.