औरंगाबाद : ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि शिंदे, भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे गटातील आमदार अस्वस्थ आहेत. त्यामुळे आता पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, असं खैरे यांनी म्हटलं आहे. आमदार अस्वस्थ असल्यानं वरिष्ठ पातळीवर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेतला जाणार नसल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या आमदारांना देखील जोरदार टोला लगावला आहे. हे 40 गद्दार पुन्हा निवडून येणार नाहीत असं खैरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी यावेळी आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये रंगलेल्या वादाची माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा रंगली. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थिने हा वाद मिटला. या वादावर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद नाटकी असल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. संतोष बांगर यांचे अवैध धंदे उघड करणार आहे. अवैध धंद्यातून बांगर पैसे कमावतात. फडणवीस अशा आमदारांना कसं सहन करणार? असा सवाल करत चंद्रकांत खैरे यांनी संतोष बांगर यांना टोला लगावला आहे.