राजगड किल्ल्यावर जाण्यापूर्वी हा नवीन आदेश वाचून जा
आदेशाचे उल्लंघन केल्यास तीन महिने शिक्षा आणि पाच हजार दंडाची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांनी दिली आहे.
![राजगड किल्ल्यावर जाण्यापूर्वी हा नवीन आदेश वाचून जा राजगड किल्ल्यावर जाण्यापूर्वी हा नवीन आदेश वाचून जा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/02/16133410/rajgad1.jpg?w=1280)
विनय जगताप, वेल्हा, पुणे : पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी आहे. आधी पुरातत्व विभागाने जारी केलेला नवीन आदेश वाचावा. त्यानंतर पर्यटन व सहलीचे नियोजन करावे. कारण किल्ल्यावर करण्यात येणाऱ्या घाणीमुळे पुरातत्व विभागाला हा निर्णय घ्यावा लागलाय. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर तीन महिने मुदतीच्या कैदेची शिक्षा किंवा पाच हजार रुपये दंडाची शिक्षा होणार आहे. पुरातत्व विभागाकडून हे आदेश जारी करण्यात आलेत. शिवाजी महाराजांचे सर्वाधिक वास्तव या किल्ल्यावर होते.
काय आहे आदेश
पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्यावर पर्यटकांना रात्रीचा मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आलीय. पर्यटक मुक्कामी राहत असल्याने भोजन बनवून कचरा किल्ल्यावरच फेकून देत आहेत. त्यामुळे किल्यावर घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य वाढत असल्यामुळे रात्रीचा मुक्कामास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यातं आलाय.
वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड या राज्य संरक्षित स्मारक परिसरात पर्यटकांना रात्रीचा मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आलीय.आदेशाची कठोर अंमलबजावणीसाठी पुरातत्त्व विभागाकडून भोर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास तीन महिने शिक्षा आणि पाच हजार दंडाची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांनी दिली आहे.
पर्यटक नाराज
पुरातत्व विभागाच्या या निर्णयामुळे अनेक पर्यटक दुर्गप्रेमीकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या नोटीस पत्रामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुराणवस्तूशास्त्रविषयक स्थळे व अवशेष नियम, १९६२ मधील नियम क्र. ४ नुसार एखाद्या संरक्षित स्मारकाचा कोणताही विशिष्ट भाग हा पुराणवस्तूशास्त्र अधिकारी, त्याचे अभिकर्ते, त्यांचा हाताखालील इसम, कामगार आणि अशा भागात कामावर असलेला कोणताही इतर सरकारी सेवक यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही इसमासाठी कायमचा किंवा एखाद्या विशिष्ट मुदतीसाठी खुला असणार नाही.
राजगड किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पर्यटक मुक्कामी राहतात. यामुळे भोजन बनवून अनुषंगिक कचरा किल्ल्यावरच फेकून देतात. तसेच शौचालय उघड्यावर करत असतात. या प्रकारांमुळे किल्यावर घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य वाढत आहे. तसेच स्मारकाच्या पावित्र्याला यामुळे धोका निर्माण झाला आहे. यामुळे स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात रात्रीच्या वेळेस पर्यटक यांना मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सोशल मीडियावर नाराजी
दरम्यान या निर्णयामुळे अनेक दुर्गप्रेमी संघटना पर्यटक सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत. किल्ले राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वाधिक काळ वास्तव्य असलेला किल्ला आहे. स्वराज्याची पहिली राजधानी असल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून लाखो पर्यटक किल्ले राजगडवर येत असतात.
एका दिवसात पूर्ण किल्ला पाहणे,फिरणे शक्य नसते. यामुळे या ठिकाणी दोन दिवस मुक्काम करण्याची सोय व्हावी अशी लेखी मागणी पुरातत्त्व विभागाकडे करणार असल्याची माहिती शिवशंभू प्रतिष्ठान कात्रजचे संस्थापक अध्यक्ष महेश यांनी दिली आहे.