पक्ष प्रवेशावेळीच नीलम गोऱ्हे यांचा ‘खाष्ट सासू’ म्हणून उल्लेख, कुणी केली टीका?

| Updated on: Jul 08, 2023 | 4:56 PM

तुम्ही भलेही कितीही पदे भोगली (हो भोगलीच, भूषवली नाही) असतील पण माणूस म्हणून तुम्ही कमालीच्या भणंग आणि कफल्लक आहात. कारण ना तुम्ही कुणाला मदतीचा हात देवू शकता ना कुणाचा उत्कर्ष बघु शकता ना उपकार कर्त्याची जाणीव ठेवू शकता.

पक्ष प्रवेशावेळीच नीलम गोऱ्हे यांचा खाष्ट सासू म्हणून उल्लेख, कुणी केली टीका?
NEELAM GORHE
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेशामुळे विधानसभेनंतर आता विधान परिषदेतही शिंदे गटाचे पारडे जड झाले आहे. मात्र, त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे आता नीलम गोऱ्हे यांच्यावर उद्धव ठाकरे गटातून जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यातच नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल ठाकरे गटाच्या नेत्याने फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून नीलम गोऱ्हे यांना थेट पत्र लिहिण्यात आले असून नीलमताई, शेवटी तुमचेही पाय मातीचेच… काही माणसं पदामुळे मोठी होतात.. काही पद माणसांमुळे मोठे होतात.. पण, काही माणसं निव्वळ माणसांमुळे मोठे होतात. तुम्ही यातल्या पहिल्या प्रकारातल्या.. अशी टीका करण्यात आलीय.

नीलम गोऱ्हे यांच्यावर उद्धव ठाकरे गटाच्या फायरब्रॅन्ड नेत्याने केलेली ही पोस्ट जशीच्या तशी

निलमताई, शेवटी तुमचेही पाय मातीचेच…

हे सुद्धा वाचा

(अ) प्रिय ताई,

तुमचे अनेक किस्से महिला पदाधिकारी सांगायचे तेव्हा मला त्यांचा राग यायचा. वाटायचं, एका विद्वान बाईला निष्कारण बदनाम केलं जातंय. लातूरच्या संघटिका चालक मामी दोन महिन्यापूर्वी डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, नीलमताईने मला प्रेसमध्ये बसू दिलं नाही. अपमानित केलं. तर, पुण्याच्या स्वाती ढमाले यांना तुम्ही गाडीत बसू दिलं नाही. सोलापूरच्या संघटिकेला मुंबई बंगल्यावर washroom वापरण्यास मज्जाव केला.

शिल्पकार राजेंद्र आल्हाट यांच्या एका प्रदर्शनात उद्घाटनाला गेल्यावर हातात कात्री देतो का म्हणुन त्याला डाफरून डाफरून बोललात. अमरावतीची पोलिस पत्नी वर्षा भोयरने तुम्हाला मदत मागितली. पण जात बघून इग्नोर केले. तुमच्या स्वश्रेष्ठत्व अन् अहंकाराचे अनेक किस्से.. म्हटलं तर वरवर खूप साधारण वाटणारे पण म्हटलं तर जातश्रेष्ठत्वाने पछाडलेले.

भांडवली व्यवस्थेविरूध्द विचार मांडता मांडता तुम्ही स्वतःच त्या व्यवस्थेचा भाग कधी झालात हे तुम्हालाच कळले नाही. स्त्री आधार केंद्राचा गवगवा करत अनेक पद, पुरस्कार अन् माया जमा करणाऱ्या तुम्ही खेळाडू महिलांबद्दल अवाक्षराने ही बोलला नाहीत. ना कृषी कायदा आंदोलनात चिरडलेल्या शेतकऱ्यांबद्दल ब्र शब्द काढला नाही. ही केवढी मोठी शोकांतिका म्हणायची..!

तुम्हाला आठवतं का जाधवर ग्रूप ऑफ इंस्टिट्युटच्या विद्यार्थी संसद कार्यक्रमात 2018 साली मी आपल्याला भेटून शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली. त्या कार्यक्रमात खडसे साहेब ही होते. तेंव्हा आपण तो विषय झुरळासारखा झटकून दिला होता. तेव्हाही आपला अहंकार आणि जातश्रेष्ठत्व वाद मला कळायला हवा होता. पण मग पुढे अनेक लोक भेटत राहीले. सागर माळकर, मदन गाडे, कितीतरी..

अगदी मागील वर्षीही माझा प्रवेश तुम्हाला अजिबात आवडला नव्हता. अन् हे माझ्याही आधी सन्मानिय वरिष्ठांनी हेरले होते. म्हणुनच प्रवेशाच्या दिवशीच तुमचा उल्लेख त्यांनी खाष्ट सासू असा केला. हे सगळं लिहिण्याचं कारण तुम्ही माझा द्वेष करताना त्याची कारणं जातीय अधिक होती.

सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातील मुलगी स्वकर्तृत्वाने उभी राहणे तुम्हाला न मानवणारे होते. तुम्हाला राजकीय जन्म प्रकाश आंबेडकरांनी दिला. पण समोर संधी दिसताच तुम्हाला त्याचा ही विसर पडला. कालचा तुम्ही केलेला उल्लेख ही तुमच्यातला काठोकाठ भरलेला जातीय विखार सांगणारा होता.

तुम्ही भलेही कितीही पदे भोगली (हो भोगलीच, भूषवली नाही) असतील पण माणूस म्हणून तुम्ही कमालीच्या भणंग आणि कफल्लक आहात. कारण ना तुम्ही कुणाला मदतीचा हात देवू शकता ना कुणाचा उत्कर्ष बघु शकता ना उपकार कर्त्याची जाणीव ठेवू शकता. तुम्ही राहता त्या मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर मध्ये ना साधी एक शाखा काढू शकलात ना , एखादा नगरसेवक निवडून आणू शकलात.

महापालिकेत नगरसेवक म्हणुन निवडून येण्याचा वकूब नसताना ज्या पक्षाने एवढं दिलं तो पक्ष आणि कुटुंब संकटात असताना, सत्तेसाठी पळ काढला. पण कुठलेही सत्तास्थान नसताना आमच्यासारखे निष्ठावान ठामपणे मातोश्री सोवत निकराची झुंज देत आहेत. अन् तुमच्यासारखे खुर्च्या टिकवण्यासाठी छळ कपट करणाऱ्यांची भाटगिरी करत आहेत.

मॅडम म्हणूनच तुमच्या पक्षप्रवेशाच्या वेळी एकही सटरफटर काय तुमच्यासारखा सो कॉल्ड सुद्धा एकही माणूस तुमच्या सोबत दिसला नाही. यावरूनच आयुष्यात तुम्ही पैसा आणि पद खूप गमावली पण माणुसकी नाही हे स्पष्ट होते. ठाकरेंचा एक माणूस आपल्याकडे घेतला याचा शिंदेंना कदाचित असुरी आनंद होईल पण तुम्हाला घेण्याचा त्यांना एकही मत वाढवण्यासाठी म्हणून फायदा नक्कीच होणार नाही.

म्हणुनच तुम्ही धोरणी राजकारणी असु शकाल पण माणूस म्हणुन भणंग आणि कफल्लक आहात..!!

प्रा. सुषमा अंधारे