मंत्रालयात खळबळ! अचानक मोठ्या घडामोडी, पोलिसांनाही समजलं नाही

| Updated on: Sep 13, 2023 | 12:51 PM

मंत्रालयात आज अचानक मोठा गोंधळ उडाला. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाळी लावण्यात आली आहे. कारण अनेकांनी याआधी या परिसरात उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. असं असताना आज मंत्रालय परिसरात अनपेक्षित अशी घटना बघायला मिळाली.

मंत्रालयात खळबळ! अचानक मोठ्या घडामोडी, पोलिसांनाही समजलं नाही
Follow us on

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : मंत्रालयात आज अचानक मोठा गोंधळ उडताना बघायला मिळाला. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या आवारात पहिल्या माळ्यावर जाळी लावण्यात आली आहे. कुणीही उडी मारुन आत्महत्या करु नये, सुरक्षेच्या कारणास्त या जाळी बांधण्यात आली आहे. याच जाळीवर उडी मारुन काही नागरिकांनी आंदोलन केल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे आंदोलन करणारे आंदोलक हे अप्पर वर्धा धरणग्रस्त आहेत. आपल्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी आज थेट मंत्रालय गाठलं आणि जाळीवर उतरून आंदोलन पुकारलं. धरणग्रस्तांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही, असा आरोप आंदोलकांचा आहे.

अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी येथे अप्पर वर्धा धरण आहे. या धरण परिसरातील धरणग्रस्तांकडून आज थेट मंत्रालयात आंदोलन करण्यात आलं. या धरणग्रस्तांचं गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. गेल्या 103 दिवसांपासून मोर्शीच्या तहसील कार्यालयासमोर या सर्व धरणग्रस्तांचं आंदोलन सुरु आहे. पण त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यांना अजूनपर्यंत न्याय देण्यात आला नाही, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी आज थेट मंत्रालयात आगळ्यावेगळ्या पद्धतीचं आंदोलन सुरु केलं.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रालयात असताना घडामोडी वाढल्या

विशेष म्हणजे मंत्रालयात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित आहेत. ते विविध बैठका आणि आपल्या कामांमध्ये व्यस्त आहेत. असं असताना आज मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी अनोख्या पद्धतीने आंदोन पुकारलं. त्यांनी आधी मंत्रालयात प्रवेश घेतला. त्यानंतर जाळीवर चढून निदर्शने देण्यास सुरुवात केली. यावेळी या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली.

आंदोलकांनी नेमका प्रवेश कसा मिळवला?

आंदोलकांची संख्या ही जवळपास 50 इतकी आहे. त्यांनी विझिटर म्हणून मंत्रालयाचा पास मिळवला. त्यानंतर पहिल्या मजल्यावर जावून सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. आंदोलकांनी सुरक्षा जाळीवर उड्या मारल्यानंतर मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली. आंदोलक नेमके आहेत कोण, ते का तिथे निदर्शने देत आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला. नंतर सर्व माहिती समोर आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पण आंदोलकांना जाळीतून बाहेर काढताना पोलिसांना अनेक अडचणी आल्या. आंदोलक आक्रमकपणे घोषणाबाजी करत होते. अखेर पोलिसांनी आंदोलकांची यशस्वीपणे धरपकड केली.

अप्पर वर्धा धरणासाठी 1972 मध्ये जमिनी घेण्यात आल्या होत्या. पण या जमिनीचा योग्य मोबदला देण्यात आला नाही. आंदोलक हे स्थानिक आहेत. पण स्थानिकांना प्रकल्पात प्राधान्याने नोकरीत घेण्यात आलं नाही. त्यामुळे या आंदोलकांकडून मोर्शी तहसील कार्यालासमोर आंदोलन सुरु करण्यात आलं होतं.