Namo Shetkari Yojana | शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारडून 2 हजार रुपये कधी जाणार? कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून महत्त्वाची अपडेट

| Updated on: May 10, 2024 | 4:27 PM

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेविषयी महत्त्वाची माहिती दिली.

Follow us on

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेतील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर येणार आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर महत्त्वाच्या हालाचाली सुरु आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याच योजनेसाठी महत्त्वाची आढावा बैठक घेतली. शेतकऱ्यांना लवकरच नमो शेतकरी महा सन्माननिघी योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात येईल, अशी माहिती बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी दिलीय. मुंडे यांच्याकडून प्रेसनोट जारी करुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना सुरु केली आहे.

“पावसाळी अधिवेशन 2023-24 मधील पूरक मागण्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी 4000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामधून योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे त्याला तात्काळ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळणे गरजेचे आहे”, असं मत धनंजय मुंडे यांनी या बैठकीत मांडल्याची माहिती समोर आली आहे.

निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार असल्याने त्यामध्ये योजनेची नोंदणी करण्यात आलेली आहे. पी.एम.किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटी कडून सुरू आहे. पी एफ एम एस प्रणालीमध्ये तांत्रिक कार्यवाही करण्यासाठी आवश्यक कालावधी कमी करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून विविध अडचणीमुळे वंचित राहिलेल्या 12 लाख शेतकऱ्यांचा पीएम किसान आणि नमो महा महासन्मान योजनेत समावेश करण्यात यावा यासाठी राज्य शासनाने गाव पातळीवर कृषी, महसूल आणि भूमिअभिलेख विभागाच्या मार्फत एकत्रित विशेष मोहीम सुरू केली होती. त्यांतर्गत आतापर्यंत 4 लाख शेतकऱ्यांनी आपल्या त्रुटी दुरुस्त करून आवश्यक अटींची पूर्तता केली आहे. भूमिअभिलेख अद्ययावत करणे, ई-केवायसी करणे, आधार बँक खात्यास संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी केले आहे. यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहीमेस आणखी 7 दिवस मुदतवाढ देण्याचेही निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

दरम्यान, मंत्रालयात पार पडलेल्या या आढावा बैठकीत कृषी आयुक्त सुनील चव्हाण, कृषी संचालक दिलीप झेंडे, महा आयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महा आयटीचे विभाग प्रमुख किरण गारग, अमेय सरवणकर, सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख, श्रेणिक शहा, उपसचिव संतोष कराड, अवर सचिव नीना शिंदे, उपआयुक्त दयानंद जाधव तसेच कृषी व माहिती तंत्रज्ञान या दोन्ही विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.