महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा पडद्यामागे हालचाली, मविआ नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, काय घडतंय?

| Updated on: Aug 17, 2023 | 8:38 PM

मुंबईत राजकीय घडामोडींना अचानक वेग आलाय. महाविकास आघाडीचे दोन मोठे नेते उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या तीनही नेत्यांमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा पडद्यामागे हालचाली, मविआ नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, काय घडतंय?
Follow us on

मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. देशात पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक असणार आहे. त्यानंतर राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात ज्या काही घडामोडी घडल्या आहेत त्या पाहता आगामी काळ हा महत्त्वाचा असणार आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरातील विरोधी पक्ष देखील सतर्क झाले आहेत. त्यातून देश पातळीवर विरोधकांच्या इंडिया आघाडीचा जन्म झालाय. असं असताना इंडिया आघाडीत बिघाडीच्या बातम्या समोर येत असतात. या चर्चांनंतर आता मुंबईत विरोधकांच्या गोटात मोठ्या हालचाली घडत असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज अचानक रात्री आठ वाजेच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही भेट अचानक नसून पूर्वनियोजित असल्याची देखील माहिती मिळत आहे.

इंडिया आघाडीच्या मुंबई बैठकीवर चर्चा होण्याची शक्यता

इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. इंडिया आघाडीची येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना या बैठकीची तयारी करायची आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सातत्याने भेटीगाठी आणि बैठका होत आहेत.

याआधी नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक

विशेष म्हणजे यापूर्वा ‘मातोश्री’वर नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यातच भेट झाली होती. या भेटीवेळी चिंता आणि साशंकता व्यक्त करण्यात आली होती. कारण पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट झाली होती. अर्थात नंतर शरद पवार यांनी माध्यमांसमोर येत भूमिका मांडलीय. त्यानंतर आता जयंत पाटील आणि नाना पटोले ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत. या तीनही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक होत आहे.