महाराष्ट्राचा मूड काय? परिवर्तन होणार की नाही?; शरद पवार यांची EXCLUSIVE मुलाखत
कोणताही राजकीय पक्ष आणि नेता आपला पुढचा कार्यक्रम मांडत असतो. त्याला लोकांसमोर जायचं असतं. त्यामुळे त्यांना स्वीकारायचं की नाही हे लोक ठरवतात, असं शरद पवार म्हणाले. जनतेने मला संधी द्यावी असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर ते बोलत होते.
![महाराष्ट्राचा मूड काय? परिवर्तन होणार की नाही?; शरद पवार यांची EXCLUSIVE मुलाखत महाराष्ट्राचा मूड काय? परिवर्तन होणार की नाही?; शरद पवार यांची EXCLUSIVE मुलाखत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/sharad-pawar-2023-08-26T102403.097.jpg?w=1280)
कोल्हापूर | 26 ऑगस्ट 2023 : मी निवडणुकीचा सर्व्हे काही पाहिला नाही. पण मी फिरतोय. सार्वजनिक जीवनात अनेक वर्ष काम केलं आहे. लोकांमध्ये जातो तेव्हा तुम्हाला लोकांचे चेहरेही काही सांगत असतात. मी अनेक निवडणुका लढलो आहे. मी पहिली निवडणूक 56 वर्षापूर्वी लढली. त्यानंतर मी 14 निवडणुका लढल्या. क्वचित अपयश आलं. पण तुम्ही व्यासपीठावर उभं राहिल्यावर तुम्हाला लोकांचे चेहरे वाचता आले पाहिजे. लोकांचा मूड समजला पाहिजे. मला महाराष्ट्राचा मूड असा दिसतोय की, लोकांना बदल हवाय. लोकांना महाराष्ट्रात भाजपच्या हातात सत्ता द्यायची नाही. अशी मानसिकता मला लोकांची दिसत आहे. त्यामुळे परिवर्तनाला अनुकूल काम लोक मतदानाच्या दिवशी करतील, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.
शरद पवार यांनी पक्षाच्या फुटीवरही भाष्य केलं आहे. लोकांना कळत नाही. पक्ष म्हणजे फक्त आमदार नसतात. पक्ष म्हणजे संघटना असते. सदस्य असतात. आज देशात राष्ट्रवादी पक्षाची जी संघटना आहे. आमदार येतो आणि जातो. पण शेवटी पक्ष महत्त्वाचा असतो. जे कोणी आमदार गेले असतील किंवा जाणार असतील, त्यांच्यावर संपूर्ण देशाची संघटना अवलंबून नाहीये. काल महाराष्ट्रात पक्षाचे प्रमुख होते जयंत पाटील. आजही जयंत पाटीलच आहे, असं शरद पवार म्हणाले.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/ajit-pawar-latest.jpeg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/Vikas-Malu.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/cm-eknath-shinde-2023-08-25T074646.290.jpg)
आमदार म्हणजे पक्ष नाही
ज्या लोकांनी वेगळी भूमिका घेतली त्यांना प्रश्न विचारला, तुमच्या देशाच्या संघटनेचे नेते कोण? त्यांनी माझंच नाव सांगितलं, आता त्यांच्या लक्षात आलं की खरं बोलल्यावर आपल्या अंगलट येतंय. त्यावर काही तरी वेगळी भूमिका घ्यावी लागेल. पक्ष हा कुठे गेला नाही. आमचे आमदार काही 24 असतील, 25 असतील. काही लोक येऊन भेटतात, काही कामासाठी गेलो सांगतात. आम्ही आहोत सांगतात. आम्ही त्यांची तपासणी केली नाही. पण आमदार म्हणजे संपूर्ण पक्ष नाही, असं शरद पवार यांनी ठणकावून सांगितलं.
निवडणूक आयोगावर केंद्राचा प्रभाव
पक्ष फुटला नाही असं म्हणता मग निवडणूक आयोगाकडे जाण्याचं कारण काय? असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर, हीच वस्तुस्थिती आहे. कुणाला सांगण्यासाठी नाही. पक्ष एकाबाजूला असेल तर वस्तुस्थिती लोकांना सांगितली पाहिजे. निवडणूक आयोगाबाबत मला सांगता येणार नाही. कारण केंद्रात सत्तेत जे बसले आहेत. त्यांचाही प्रभाव निवडणूक आयोगावर किती आहे त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात, असं त्यांनी सांगितलं.
लोकांमध्ये जाणार
2024चा आम्ही सर्व विचार करत आहोत. महाराष्ट्र विकास आघाडी नावाची संघटना मान्य केली आहे. महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी आघाडीचा वापर करणार आहोत. लोकांचा पाठिंबा घेणार आहोत. या आघाडीच राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट असणार आहे. त्याशिवाय शेतकरी कामगार पक्ष आणि इतर छोटे तसेच महत्त्वाचे पक्ष असणार आहे. त्यांना सोबत घेऊन लोकांसमोर जाणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.