Rain Update : राज्यात आता कुठे दिला रेड अलर्ट, अजून दोन दिवस पावसाचा जोर कायम

| Updated on: Jul 28, 2023 | 7:58 AM

Weather update and Rain : राज्यातील सर्वच भागांत जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत आठवडभरापासून पावसाने विश्रांती घेतली नाही. शुक्रवारी हवामान विभागाने मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलाय.

Rain Update : राज्यात आता कुठे दिला रेड अलर्ट, अजून दोन दिवस पावसाचा जोर कायम
Follow us on

पुणे | 28 जुलै 2023 : राज्यात मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी कायम आहे. राज्यातील सर्वच भागांत पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने शुक्रवारी पुन्हा मुंबईला रेड अलर्ट दिला आहे. मुंबईसह ठाणे, गडचिरोली, यवतामाळ जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे आणि पालघरमधील शाळांना सुटी जाहीर केली गेली आहे. राज्यात जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे पावसाने सरासरी गाठली आहे. आतापर्यंत १०४ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील १७८ तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आँरेज अलर्ट दिला आहे. पुणे, सातारा, सांगली, पालघर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. रत्नागिरीत तिसऱ्या दिवशी पावसाची धुवाधार बॅटिंग सुरु आहे. ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्याने कल्याण डोंबिवली परिसरातील सर्व शाळांना पालिकेकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

ठाणे परिसरात सकाळ पासून रिमझिम पाऊस सुरु आहे. शुक्रवारी ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. दुपारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील रस्त्यांवर साचलेले पाणी ओसरले आहे.

राधानगरी धरणातून विसर्ग

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 41 फुटांवर आला आहे. राधानगरी धरणाच्या चार स्वयंचलित दरवाजातून सुरू विसर्ग आहे. पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

अमरावतीत ढगफुटी सदृश्य पाऊस

धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर,चांदुररेल्वे तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. मुसळधार पावसामुळे अमरावतीमधील अनेक घरात पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन अन् तूर पीक पाण्याखाली गेली आहे. आजही दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

किती टक्के पेरण्या झाल्या

राज्यात ८५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. सर्वात जास्त पेरणी सोयाबीनची १११ टक्के झाली आहे. त्यानंतर कापसाची ९६ टक्के लागवड झाली आहे. राज्यातील धरणांमध्ये जलसाठा चांगला वाढत आहे. कोयना धरणात ६४ टीएमसी जलसाठा झाला आहे.