घनदाट जंगल, अवघ्या तीन दिवसांच्या जुळ्या मुली, गावकरी वाचवायला आले आणि अचानक दगडांचा मारा…
उदयपूरच्या घनदाट जंगलात गावकऱ्यांना 'त्या' दोघी जुळ्या मुली दिसल्या. ते त्या मुलींच्या दिशेने निघाले. इतक्यात त्यांच्या दिशेने एका पाठोपाठ एक दगडांचा वर्षाव होऊ लागला. काही गावकरी घाबरून पळाले.
![घनदाट जंगल, अवघ्या तीन दिवसांच्या जुळ्या मुली, गावकरी वाचवायला आले आणि अचानक दगडांचा मारा... घनदाट जंगल, अवघ्या तीन दिवसांच्या जुळ्या मुली, गावकरी वाचवायला आले आणि अचानक दगडांचा मारा...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/17225300/aravali-village.jpg?w=1280)
उदयपूर : ‘जाको राखे साइयां, मार सके न कोय’ ही म्हण नुकत्याच जन्मलेल्या एका जुळ्या बहिणींबाबत अगदी खरी ठरली. अरावलीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या उदयपूरचं घनदाट जंगल. मोठं मोठे दगड, दाट झाडी. या जंगलाखाली असणाऱ्या गावाताल गावकऱ्यांना रात्रीच्या भयाण शांततेत जंगली प्राण्याचे भयानक आवाज ऐकू यायचे. पण, गेले तीन दिवस त्यांना रात्रीच्या शांत वातावरणात मुलांच्या रडण्याच्या आवाज ऐकू येत होता. नेमकं हे प्रकरण काय ते गावकऱ्यांना समजले नाही. अखेर, सर्वानी मिळून आवाजाच्या दिशेने शोध घेण्याचा निर्णय घेतला. ते त्या मुलांच्या शोधात निघाले. त्यांचा शोध पूर्ण झाला. मात्र, समोरचे दृश्य पाहून त्यांचेही काळीज पिळवटले.
उदयपूरच्या घनदाट जंगलात गावकऱ्यांना ‘त्या’ दोघी जुळ्या मुली दिसल्या. ते त्या मुलींच्या दिशेने निघाले. इतक्यात त्यांच्या दिशेने एका पाठोपाठ एक दगडांचा वर्षाव होऊ लागला. काही गावकरी घाबरून पळाले. मात्र, त्यातील काही जणांनी ही माहिती स्थानिक पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, त्यांच्यावरही दगडफेक होऊ लागली.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/08235211/antysankar.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/08193441/shrusti-bihar.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/08030323/indur-police.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/29213832/dog-12.jpg)
गावकरी आणि पोलिसांवर दगडफेक करणारी ती व्यक्ती आणखी दुसरी तिसरी कुणी नसून त्या मुलींची आई होती. गावकऱ्यांनी त्या मुलींसाठी दूध आणले आणि त्या मुलीजवळ ठेवले. त्यांची ती कृती पाहून ती माता शांत झाली. ती ही त्या मुलींच्या जवळ आली. गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने तिला आणि त्या दोन्ही मुलींना गावात आणले.
अरावली डोंगराखाली असलेल्या चिरवा या गावात ही घटना घडली. गावचे सरपंच प्रकाश गमेती यांच्या म्हणण्यानुसार, या मुली दिवसा रडत असत. पंरतु, वाहनांच्या आवाजामध्ये त्या मुलींचा आवाज ऐकायला येत नसे. पण, रात्रीच्या शांत वातावरणात त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. आम्ही शोध घेतला तेव्हा या मुली दगडांवर पसरलेल्या चिंध्यावर ठेवल्या होत्या. तीन दिवसांच्या या जुळ्या मुली जन्मानंतर फारशी काळजी न घेता, उष्मा, भूक, तहान लागेपर्यंत या भागात कसे जगले? याचे आश्चर्य आहे.
या घटनेची माहिती जिल्हाधिकारी तारचंद मीणा यांना मिळताच त्यांनी अधिकाऱ्यांची एक टीम गावात पाठविली. या टीमने त्या मुलींची आई आणि नवजात मुलींना एमबी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आता तिघांचीही प्रकृती सुधारत आहे.
एमबी हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ आर एल सुमन यांनी सांगितले की, भुकेल्या आणि तहानलेल्या मुलींची प्रकृती आता चांगली आहे. परंतु, त्यांच्या आईची महिलेची मानसिक स्थिती ठीक नाही. तिला फार मोठा मानसिक धक्का बसला असल्यामुळे ती मानसिक रुग्ण बनली आहे. त्यामुळेच आपल्या मुलींजवळ ती कोणालाही येऊ देत नाही.
पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर
पोलिसांनी त्या महिलेबाबत अधिक माहिती घेतली असता ही महिला उदयपूर-नाथद्वारा रोडवरील चिरवा येथील रहिवासी असल्याचे समोर आले. तीन वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तिच्यावर काही अज्ञातांनी बलात्कार केला. तेव्हापासून तिची मानसिक स्थिती बिघडली. त्यातच ती गरोदर राहून तिला जुळ्या मुली झाल्या अशी माहिती पोलिसांना मिळाली. यासोबतच तिच्या जवळच्या लोकांशी संपर्क साधून अधिक तपास करण्यात येत आहे.
पोलिसांच्या या माहितीनंतर आता डॉक्टरांची एक टीम तिचे समुपदेशन करत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी ताराचंद मीणा यांनी त्या महिलेला विधवा पेन्शन सुरू करून मुलींना पालनहार योजनेचा लाभ देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. ही दोन्ही कामे १५ दिवसांत सुरू करण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले आहेत.