The Kerala Story | फेम अभिनेत्रीच्या वडिलांना सतावतेय मुलीची चिंता; म्हणाली “माझे वडील घाबरून..”
द केरळ स्टोरी या चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तमिळनाडूमध्येही चित्रपटाविरोधात निदर्शनं झाली. "निर्माते त्यासाठी लढणार आहेत. ज्या लोकांना खरंच हा चित्रपट पाहायचा आहे, त्यांना तो पहायला मिळू दे एवढीच माझी इच्छा आहे", असं ती म्हणाली.
![The Kerala Story | फेम अभिनेत्रीच्या वडिलांना सतावतेय मुलीची चिंता; म्हणाली माझे वडील घाबरून.. The Kerala Story | फेम अभिनेत्रीच्या वडिलांना सतावतेय मुलीची चिंता; म्हणाली माझे वडील घाबरून..](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/07214327/the-kerala-story-26-1.jpg?w=1280)
मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय. यामध्ये अदा शर्मासोबतच योगिता बिहानी, सिद्धी इदनानी, सोनिया बलानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यापैकी योगिकाने तिच्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली. त्यानंतर ती चित्रपटांकडे वळली. ‘एके वर्सेस एके’ आणि ‘विक्रम वेधा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. आता ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत योगिता तिच्या प्रवासाविषयी आणि चित्रपटानंतर कुटुंबीयांच्या प्रतिक्रियेविषयी व्यक्त झाली.
“मी आणि अदा याविषयी बोलत होतो. आम्ही फार प्रामाणिकपणे हा चित्रपट बनवला आहे. आमच्यासाठी हा जणू एक कॉलेज प्रोजेक्ट होता. तो आम्ही मेहनतीने बनवल्यानंतर सुपूर्द केला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून आम्ही थक्क आहोत”, असं ती म्हणाली. एकीकडे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई होत असतानाच दुसरीकडे ठराविक वर्गाकडून चित्रपटाला विरोध होत आहे.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/12210853/Kubbra-Sait.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/11205132/Asit-Kumarr-Modi-and-Mrs-Roshan-Sodhi.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/04/02002120/karan-johar-39.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/12170313/Adah-Sharma-2-1.jpg)
‘द केरळ स्टोरी’वरून सुरू असलेल्या वादामुळे वडिलांना फार चिंता वाटते आणि त्यामुळेच मी त्यांना फक्त सकारात्मक गोष्टीच सांगते, असंही ती म्हणाली. “माझे वडील माझ्यासाठी घाबरलेले आहेत. या वादामुळे ते सतत मला विचारतात की तू ठीक आहेस का? त्यांची चिंता पाहून मी त्यांना फक्त सकारात्मक गोष्टीच सांगते. सर्वकाही ठीक होईल असं मी त्यांना आश्वासन देते”, असं योगिताने सांगितलं. इतकंच नव्हे तर कुटुंबीयांना चित्रपट दाखवण्याआधी त्यांना नीट समजावं लागलं होतं, असंही ती म्हणाली.
View this post on Instagram
‘द केरळ स्टोरी’ला प्रचारकी म्हणणाऱ्यांनाही योगिताने उत्तर दिलं. “आम्ही हा चित्रपट या तीन मुलींची कथा सांगण्यासाठी बनवला आहे. आम्हाला लोकांमध्ये ही जागरूकता निर्माण करायची आहे की असं काही होऊ शकतं. त्या घटनेतून ज्यांची सुटका झाली किंवा ज्यांनी त्रास सहन केला, त्यांना आम्हाला सक्षम बनवायचं आहे. आम्ही तुमचं ऐकतोय आणि तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी इथे आहोत, याची त्यांना खात्री द्यायची आहे. याव्यतिरिक्त जे लोकांना वाटतं, त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. कारण या चित्रपटाचा तो अजेंडाच नाही. प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात आणि आम्ही त्यांचा आदर करतो. जर त्यांना चित्रपट पाहायचा असेल तर ते पाहतील. जर पाहायचा नसेल, तरीसुद्धा आम्ही त्यांचा आदर करतो. आम्ही इतरांची मतं बदलू शकत नाही. पण हा चित्रपट आम्ही का बनवला, याबद्दल आम्हाला स्पष्टता आहे. आम्हाला फक्त आमच्या मुलींना वाचवायचं आहे”, असं उत्तर योगिताने दिलं.
द केरळ स्टोरी या चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तमिळनाडूमध्येही चित्रपटाविरोधात निदर्शनं झाली. “निर्माते त्यासाठी लढणार आहेत. ज्या लोकांना खरंच हा चित्रपट पाहायचा आहे, त्यांना तो पहायला मिळू दे एवढीच माझी इच्छा आहे”, असं ती म्हणाली.