Nagpur Crime : घरगुती वाद टोकाला गेला, मग भररात्रीत पतीने पत्नीचा काटा काढला !
पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होत होते. याच वादातून पतीने टोकाचे पाऊल उचलले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
![Nagpur Crime : घरगुती वाद टोकाला गेला, मग भररात्रीत पतीने पत्नीचा काटा काढला ! Nagpur Crime : घरगुती वाद टोकाला गेला, मग भररात्रीत पतीने पत्नीचा काटा काढला !](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/04/22013712/husband-wife-dispute.jpg?w=1280)
नागपूर / 18 जुलै 2023 : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीची सखोल चौकशी सुरु आहे. रमेश भारसकर असे आरोपी पतीचे नाव आहे. तर अर्चना रमेश भारसकर असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे नंदनवन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागपुरात हत्येचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. सतत या ना त्या कारणातून हत्या घडल्याच्या घटना समोर येत आहेत.
काय घडलं नेमकं?
अर्चना ही सतत फोनवर कुणाशी तरी बोलायची. यामुळे पतीला तिच्या संशय होता. यातून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे. याच वादातून पत्नी माहेरी निघून गेली होती. दोन महिन्यांपूर्वीच ती आपल्याकडे परत आली होती. यानंतर दोघांमध्ये पुन्हा खटके उडू लागले. याच वादातून सोमवारी रात्री झोपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घातला. यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत. या घटनेमुळे महिलेच्या कुटुंबीयांना धक्काच बसला आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भारसकर जोडप्याला दोन मुली आहेत. आईच्या हत्येमुळे मुली अनाथ झाल्या आहेत. तसेच हत्या करणारे वडिल तुरुंगात गेल्यामुळे या मुलींच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.