Inflation : कांदा नाही तर लिंबाने आणले ग्राहकांच्या डोळ्यात पाणी, जेवणातून लिंबू गायब

| Updated on: Apr 30, 2022 | 11:40 AM

भाजीपाल्याचे दर देखील गगनाला भिडले आहे. लिंबांच्या दरात मोठी वाढ पहायला मिळत असून, लिंबाच्या एका नगासाठी दहा रुपये मोजण्याची वेळ आली आहे.

Inflation : कांदा नाही तर लिंबाने आणले ग्राहकांच्या डोळ्यात पाणी, जेवणातून लिंबू गायब
संग्रहित छायाचित्र
Follow us on

मुंबई : देशात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. इंधनापासून (Fuel) ते भाजीपाल्यापर्यंत (vegetables) सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. आता त्यात भरीस भर म्हणजे कधी नव्हे ते लिंबांच्या दरात देखील मोठी वाढ पहायला मिळत आहे. कांद्याचे भाव वाढल्यानंतर कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले असे म्हणण्याची प्रथा आहे, मात्र इथे आता लिंबाने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. लिंबाच्या एका नगासाठी तब्बल दहा रुपये मोजावे लागत आहेत. याचाच परिणाम म्हणजे आता हॉटेल आणि मेसमधून देखील लिंबू गायब झाले आहे. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यास आपल्याला ताटात हमखास कांदा आणि लिंबू देण्यात येते. मात्र सध्या लिंबाचे दर वाढल्याने महागाईचे कारण देत लिंबू देण्यास नकार देण्यात येत आहे. लिंबाच्या एका कॅरेटची किंमत सहाशे ते सातशेच्या घरात पोहोचली आहे.

मिम्सचा सुळसुळात

लिंबाचे दर अचानक वाढल्याने सोशल मीडियावर मिम्सचा सुळसुळात पहायला मिळत आहे. लिंबाच्या दरवाढीवरून अनेक मजेदार मिम्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. नजर लागू नये म्हणून घराच्या बाहेर मिरच्या आणि लिंबू लावण्याची प्रथा आहे. मात्र आता त्यातून देखील लिंबू गायब झाल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी लिंबाची फोड आणि काचेच्या बावूलमध्ये गरम पाणी देण्यात येते. मात्र आता फक्त गरम पाणीच देण्यात येत आहे. लिंबाची फोड गायब झाल्याचे चित्र आहे.

ऊस, लिंबाच्या रसात दुप्पट वाढ

सध्या उन्हाळा सुरू आहे. पारा चांगलाच वाढला आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत असल्याने नागरिकांच्या आंगाची लाहीलाही होत आहे. उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी पाय आपोआपच रसवंतीकडे वळतात. मात्र आता ऊस आणि लिंबाच्या रसात देखील दुप्पट वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. उसाच्या रसात देखील पूर्वी लिंबाचा वापर करण्यात येत होता. मात्र आता लिंबांचे दर वाढल्यापासून लिंबाचा वापर बंद झाला आहे. पूर्वी रसाचा एक ग्लास दहा रुपयांना मिळायचा आता त्यामध्ये वाढ होऊन तो वीस रुपयांवर पोहोचला  आहे.