Tomato Price : टोमॅटोचा उतरला का तोरा, आता काय आहे भाव

| Updated on: Aug 16, 2023 | 5:24 PM

Tomato Price : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो महागाईत तेल ओतले आहे. देशातील अनेक शहरात आणि ग्रामीण भागात टोमॅटोची दरवाढ डोकेदुखी ठरली. ऑगस्ट महिन्यातही काही भागात टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत तर कुठे त्या कमी झाल्या आहेत.

Tomato Price : टोमॅटोचा उतरला का तोरा, आता काय आहे भाव
Follow us on

नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : केंद्र सरकारने टोमॅटोच्या किंमती (Tomato Price) कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. नेपाळमधून टोमॅटो आयात (Nepal Tomato Import) करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आयात शुल्क हटविण्यात आले आहे. त्यामुळे उत्तर भारतात टोमॅटोच्या किंमती घसरल्या. केंद्र सरकारच्या ग्राहकांशी संबंधित संकेतस्थळावर टोमॅटोच्या किंमती घसरल्याचे दिसते. देशाची राजधानी दिल्लीत टोमॅटोच्या किंमती कमी (Price Reduce) झाल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक शहरातही या किंमती घसरल्या आहेत. जून महिन्यात एक किलो टोमॅटोची किंमत 25-30 रुपयांदरम्यान होती. पण ती नंतर झपाट्याने वाढली. टोमॅटोने थेट 250 रुपयांपर्यंत झेप घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटकातील टोमॅटो उत्पादक शेतकरी मालामाल झाले.

किती कमी झाल्या किंमती

केंद्र सरकारच्या संकेतस्थळानुसार, दोन आठवड्यात टोमॅटोच्या किंमतीत मोठी घसरण झाली. एक किलो टोमॅटोची किंमत 100 रुपयांच्या आसपास आहे. टोमॅटोच्या किंमतीत 90 रुपयांची घसरण झाली. देशातील इतर भागात तर यापेक्षा किंमती घसरल्या आहेत. टोमॅटोच्या किंमती आणि इतर भाजीपाला स्वस्त झाल्यास महागाईचा दर अजून खाली होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

दिल्लीमध्ये स्वस्ताई

दिल्लीत टोमॅटोच्या किंमती 177 रुपये होत्या. 15 ऑगस्ट रोजी या किंमती 107 रुपये प्रति किलोपर्यंत उतरल्या. दोन आठवड्यात टोमॅटोच्या किंमतीत जवळपास 90 रुपये प्रति किलोची घसरण दिसून आली. मध्यप्रदेशातील भिंडमध्ये टोमॅटोच्या किंमती 240 रुपये प्रति किलो आहेत. तर सिहोरमध्ये या किंमती 198 रुपये प्रति किलो आहेत.

इतर शहरात काय भाव

चंदीगड शहरात टोमॅटोचा भाव 90 रुपये प्रति किलो, अमृतसरमध्ये 120 रुपये, लखनऊमध्ये 150 रुपये प्रति किलो, उत्तर प्रदेशातील हापूड शहरात 68 रुपये प्रति किलो, हरिद्वारमध्ये 180 रुपये, बेंगळुरुत 97 रुपये प्रति किलो, कोलारमध्ये 107 रुपये प्रति किलो, चेन्नईत 72 रुपये, मुंबईत 158 रुपये प्रति किलो भाव आहे.

महागाईने गाठला कळस

यंदा महागाईने कळस गाठला. त्यात भाज्यांचा सर्वात मोठा हात आहे. किरकोळ महागाई या काळात सूसाट धावली. किरकोळ महागाई दर 15 टक्क्यांनी वाढला. टोमॅटोनी त्यात सर्वाधिक भर घातली. जुलैमध्ये किरकोळ महागाई दर दर 7.44 टक्के नोंदविण्यात आला. गावात महागाई दर 7.63 टक्के होता तर शहरात किरकोळ महागाई 7.2 टक्के होता.

महागाई होईल कमी

महागाईसंबंधीचे सर्व अंदाज फेल गेले आहे. आता समाधानकारक पावसामुळे देशातील किरकोळ महागाई दर कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात किंमतीत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण डाळी, धान्य आणि मसाला पदार्थांमध्ये कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता एकदम कमी आहे.