BREAKING : डीएड बंद होणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता पर्याय काय?

| Updated on: Apr 03, 2023 | 8:24 PM

शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने आता डीएडचं शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचं असेल तर आगामी काळात यासाठी चार वर्षांच्या पदवीचं शिक्षण घेणं अनिवार्य राहणार आहे.

BREAKING : डीएड बंद होणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता पर्याय काय?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने डीएडचं शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात आता डीएड बंद होणार आहे. आता शिक्षक होण्यासाठी आगामी काळात 4 वर्षांची बीएडचीच पदवी घ्यावी लागणार आहे. याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतलेला. नव्या शिक्षण धोरणांनुसार याबाबत निर्णय घेण्यात आलेला. केंद्र सरकारने डीएड बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य सरकारने देखील याबाबत निर्णय घेतला आहे.

आता जिल्हा परिषद शाळा आणि इतर शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी इयत्ता बारावीनंतर चार वर्षांची बीएड पदवी घेणं अनिवार्य राहणार आहे. विशेष म्हणजे बीएडच्या शिक्षणातही स्पेशलायजेशन असणार आहे. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीस सुरुवात केलीय. त्यानंतरही राज्यात आता नव्या शैक्षणिक धोरणांनुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे.

नव्या शैक्षणिक धोरणांनुसार, आता बीएड बंद होणार आहे. तसेच पीजी केलेल्या विद्यार्थ्यांना एका वर्षात डीएड करता येणार आहे. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी बीएडचं शिक्षण असेल. तर बारावीनंतर ही डीग्री मिळवण्यासाठी चार वर्षांचं शिक्षण घ्यावं लागेल. विशेष म्हणजे कोणत्या विषयाचं शिक्षक व्हायचं यावरुन विषय निवड असेल.

हे सुद्धा वाचा

डीएडने एक काळ चांगलाच गाजवला

एक काळ होता जो डीएडने चांगलाच गाजवलाय. डीएड करुन शिक्षक व्हायचं असा एक ट्रेंड काही वर्षांपूर्वी होता. पण सगळेच विद्यार्थी करिअरसाठी सरसकट डीएड निवडू लागले. त्यामुळे पुढे डीएड करणाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम पडला. नोकऱ्या मिळत नव्हत्या. अनेक विद्यार्थी त्यामुळे नैराश्यात गेले. अनेकांनी त्यातून टोकाचे निर्णय घेतले. तर काहींनी बीएड करुन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. काहींना नोकरी मिळाली तर काहींना नाही मिळाली. त्यामुळे काहींनी इतर क्षेत्राचा अभ्यास केला आणि नोकरी मिळवली. काहीजण पुन्हा शेतीकडे वळले, आपल्या वडिलांना शेतात मदत करु लागले तर काही जण व्यवसायात गुंतले.

या सगळ्या दरम्यान डीएड आणि बीएडच्या शिक्षणात अनेक बदल झाले. 90च्या काळात दहावीनंतर डीएड करता यायचं. पण शिक्षणात बदल होत गेले, साक्षर वर्ग वाढत गेला. त्यानंतर 1996 साली आलेल्या शिवसेना आणि भाजप युतीच्या सरकारने दहावीनंतरचं डीएडचं शिक्षण बंद केलं. बारावीनंतर डीएडचं शिक्षण सुरु केलं. त्यानंतर आता सरकारने डीएडचं शिक्षणच बंद केलं आहे. शिक्षक व्हायचं असेल तर आता त्यासाठी पदवीच लागेल, अशी अट ठेवली आहे. शिक्षक बनण्यासाठी कराव्या लागणाऱ्या शर्यती पाहता किती विद्यार्थी बीएडकडे वळतात हा चिंतनाचा विषय असला तरी पण आज ज्यांनी डीएड केलंय त्यांचं काय? ज्या विद्यार्थ्यांनी डीएड करुन नोकरी मिळवण्याचा विचार केलेला त्यांना आता बीएड करणं अनिवार्य राहील का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.