हरी तुला मरू देणार नाही… हरी नरके यांच्या आठवणीने भुजबळ स्टेजवरच ढसाढसा रडले

| Updated on: Aug 12, 2023 | 1:15 PM

भिडेवाड्याच्याबाबत कोर्टाने पुरावे मागितले. तेव्हा हरीने कोल्हापूरपासून अनेक ठिकाणी फिरून पुरावे उभे केले. आता वाटतं पुढे काय? कोण आम्हाला पुरावे देणार? कोण सांगणार?

हरी तुला मरू देणार नाही... हरी नरके यांच्या आठवणीने भुजबळ स्टेजवरच ढसाढसा रडले
chhagan bhujbal
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ विचारवंत, संशोधक, फुले-शाहू- आंबेडकरी विचारांचे अभ्यासक हरी नरके यांचं चार दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेत बोलताना छगन भुजबळ यांना अश्रू अनावर झाले. हरी नरके यांच्या आठवणीने भुजबळ ढसढसा रडले. त्यामुळे संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. यावेळी भुजबळ यांनी हरी नरके यांच्या आठवणींना उजाळा दिला. हरी तुला मरू देणार नाही, असं सांगत भुजबळ यांनी नरके यांच्या नावाने ग्रंथालय उभारणार असल्याची घोषणा केली. तसेच हरी नरके यांच्या नावाने शिष्यवृत्ती देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

वांद्रे येथील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये हरी नरके यांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भुजबळ बोलायला उभे राहिले. हरी नरके यांच्या निधनाची बातमी आपल्यासाठी धक्कादायक होती, असं त्यांनी सांगितलं. क्रांती दिनाच्या कार्यक्रमाला ऑगस्ट क्रांती मैदानात होतो. तेव्हा अचानक माझ्या सहाय्यकाने मला कानात येऊन सांगितलं. हरी नरके उद्याच्या कार्यक्रमाला येणार होते. मध्येच वांत्या झाल्या. मी म्हटलं, बरं मी भेटतो त्यांना. ते म्हणाले, हरी गेले. हे ऐकल्यावर माझं डोकच बधीर झालं. मला क्षणभर काहीच सूचनासं झालं. मी म्हटलं अरे काय सांगतो काय हे. ते म्हणाले हो, खरंय. समोरच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ताबडतोब नेलं, असं छगन भुजबळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काय सांगायचं?… अन् भुजबळांना अश्रू अनावर

काय सांगायचं…? असं म्हटल्यानंतर भुजबळ क्षणभर थांबले. त्यानंतर त्यांना अचानक गहिवरून आलं. तशाच अवस्थेत ते बोलायला लागले. फुले, शाहू, आंबेडकरांच्या या पुरोगामी लढाईत…. असं भुजबळ उद्गारले आणि अचानक भुजबळांना अश्रू अनावर झाले. भुजबळ स्टेजवरच माईक समोर ढसाढसा रडायला लागले. इतके की ते हातानेच अश्रू पुसायला लागेल. बराच वेळ त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यानंतर त्यांनी स्वत:ला सावरलं आणि आपल्या मित्र, मार्गदर्शकाच्या आठवणींना उजळाला दिला.

वैचारिक आधारस्तंभ लागतो

सगळीकडून जेव्हा वार होत आहेत. तेव्हा कोणी तरी सपोर्ट लागतो. वैचारिक आधारस्तंभ लागतो. तो आधारस्तंभच गेला. याच हॉलमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना अनेकवेळा हरीने वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केलं. प्रसंगी रागावले. असं नाही, असं करू या, असं सांगितलं. किती मोठा मनुष्य… कदाचित होता तेव्हा लक्षात आलं नाही, असं भुजबळ म्हणाले.

हरी म्हणजे खणखणीत नाणं

फुले शाहू आंबेडकर म्हटल्यावर कुणालाही अंगावर घेऊन लढायला तयार. नुसतं अभद्र शब्द वापरले नाही. तर पुराव्यासहीत भांडायाचे. हरी म्हणजे खणखणीत नाणं होतं. प्रबोधनाच्या चळवळीत सुरुवात करायची असेल तर सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे, असं हरी म्हणायचा. त्यांनी नुसतं म्हटलं नाही, तर तसे जगले. त्यांनी आईला सांगितलं, मी लग्न करीन तर आंतरजातीय विवाह करेल. मुलगी तू ठरव. त्यांच्या लग्नाला त्यांच्या पाठी पुलं देशपांडे उभे होते, अशी आठवणही त्यांनी सांगितलं.

तेव्हा हरीला साद घातली

नामांतराच्या लढ्यात त्यांनी भाग घेतला. त्यांनी तुरुंगवास भोगला. प्रतिगामी आवाज वाढला तेव्हा हरी, उत्तमराव कांबळे आणि रावसाहेब कसबे यांना आम्ही साद घातली. या तिघांनी दौरे केले. दोन दोन तास ते भाषण करायचे. फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार इतिहासजमा होणार की काय अशी अवस्था असताना हे तिघे उभे राहिले, असंही ते म्हणाले.

ते आमचे प्रॉम्प्टर होते

भिडेवाड्याच्याबाबत कोर्टाने पुरावे मागितले. तेव्हा हरीने कोल्हापूरपासून अनेक ठिकाणी फिरून पुरावे उभे केले. आता वाटतं पुढे काय? कोण आम्हाला पुरावे देणार? कोण सांगणार? खरं तर ते आमचे प्रॉम्प्टर होते. ते सांगायचे आणि आम्ही बोलायचो. आता ते नाहीत. त्यामुळे आमचं खूप नुकसान झालंय. आम्हीही ठरवलंय, हरी तुला आम्ही मरू देणार नाही. हे काम आम्ही नेटाने पुढे नेऊ, असं भुजबळ यांनी सांगितलं.

तीन मोठ्या घोषणा

हरी नरके यांची सर्व ग्रंथ एकत्र करून हरी नरके यांच्या नावाने एक ग्रंथालय निर्माण करू. 25 हजार पुस्तके या ग्रंथालयात असतील.

हरी नरके यांची सर्व पुस्तके पुन्हा प्रकाशित करणार

हरी नरके यांच्या नावाने 5 लाखांची शिष्यवृत्ती देणार. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या इतिहास संशोधनासाठी पीएचडी करणाऱ्यांना, शोध पत्रिका सादर करणाऱ्यांना, गरीब विद्यार्थी, फुले-शाहू आंबेडकरी विचाराचा प्रसार करणारे, आणि मागासवर्गीयांसाठी काम करणाऱ्यांना पाच लाखांची शिष्यवृत्ती दिली जाईल. त्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. ही समिती या लोकांचा शोध घेईल.