कष्टातून शेती फुलवली होती, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर स्वप्न रंगवली; मात्र, अर्ध्यात जे घडलंय ते दुर्दैवी…

| Updated on: May 08, 2023 | 1:02 PM

कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकटाशी सामना करून शेती फुलवणाऱ्या तरुण शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या तळ्यातून स्वप्न पूर्ण होणार होते त्याच तळ्यात शेतकऱ्याचा शेवट झाला आहे.

कष्टातून शेती फुलवली होती, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर स्वप्न रंगवली; मात्र, अर्ध्यात जे घडलंय ते दुर्दैवी...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : शेती करत असतांना अनेक शेतकऱ्यांवर असा प्रसंग येतो की संपूर्ण कुटुंबच मोठ्या संकटात सापडत असतं. विजेचा धक्का लागून कुणाचा मृत्यू होतो तर कधी साप चावून तर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. इतकंच काय जंगली जनवारांनी हल्ला केल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पाचोरे वणी येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खरंतर उन्हाळ्यात पाण्याचा साठा कमी पडू नये यासाठी शेतात पाण्याचे तळे केले होते. त्यामध्ये पाणी बाहेर काढण्यासाठी बसविण्यात आलेली मोटर मध्ये बिघाड झाला होता. याच दरम्यान दुरुस्ती करत असतांना मोटर ओढतांना पाय सरकला आणि तरुण शेतकरी पाण्यात पडला.

खरंतर 34 वर्षीय जगदीश भास्कर वाटपाडे हे पाण्यात पडल्यानंतर त्यांना पोहता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी जीव वाचविण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवी बाब म्हणजे जवळपास कोणी नसल्याने ही बाब लवकर लक्षात आली नाही.

याच दरम्यान काही काळाने जगदीश वाटपाडे हे घरी न परतल्याने त्यांना कुटुंबातील व्यक्तींनी फोन केला मात्र, त्यांचा फोन लागत नसल्याने त्यांचा शोध सुरू झाला. याच वेळी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगल्याचे समोर आले.

हे सुद्धा वाचा

स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. त्यांना जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याची माहिती दिली.

त्यानंतर शासकीय रुग्णालयात त्यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या हाती मृतदेह देण्यात आला. पिंपळगाव पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान या घडलेल्या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून शेती काम करत असतांना काळजी घ्यायला हवी असंही बोललं जात आहे. एकूणच शेतकऱ्यांवर येणारं हे संकट संपूर्ण कुटुंबाला अडचणीत टाकणारे आहे.