डोंगराला भेगा पडून काही भाग खचला, मोरेवाडी गावात भीतीचे वातावरण

| Updated on: Jul 22, 2023 | 11:14 PM

23 कुटुंबांना शेल्टरमध्ये हलवण्यात आलंय. ही शेल्टर्स मोरेवाडी गावाजवळच बनवण्यात आली आहेत.

डोंगराला भेगा पडून काही भाग खचला, मोरेवाडी गावात भीतीचे वातावरण
Follow us on

सातारा : सातारा जिल्ह्यातील पश्चिम‌ भागात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं दरडी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. या पावसानं सातारा तालुक्यातील मोरेवाडी या ठिकाणी डोंगराला भेगा पडल्या. काही भाग खचला असल्याचं निदर्शनास आलंय. यामुळं याठिकाणच्या लोकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. प्रशासन या ठिकाणी पोहोचून लोकांना शेल्टरमध्ये राहण्याची विनंती करतायेत. 23 कुटुंबांना शेल्टरमध्ये हलवण्यात आलंय. ही शेल्टर्स मोरेवाडी गावाजवळच बनवण्यात आली आहेत. या ठिकाणी ही कुटुंब सध्या राहात आहेत.

 

गावात भीतीचे वातावरण

सातारा तालुक्यातील पश्चिमेच्या बाजूस तारळी धरणाच्या अगदी जवळ असणाऱ्या मोरेवाडी गावात भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. गावाच्या लगत असणाऱ्या डोंगरालाच मोठ्याला भेगा पडल्यात. गावावर हा डोंगर काळ बनून उभा असल्याचं पाहायला मिळतंय. डोंगराला भेगा पडल्यामुळं या ठिकाणचे भले मोठे दगड देखील अनेक फूट पुढे सरकलेत. नेहमी या ठिकाणी येणाऱ्या लोकांनी हे पाहिले. त्यानंतर गावात भीतीचं वातावरण पसरलंय.

23 कुटुंब सुरक्षित स्थळी हलवले

मोरेवाडी गावातील 23 कुटुंब सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहेत.शेल्टरमध्ये या लोकांना हलवलं असलं तरी प्रत्येक पावसाळ्यात मृत्यू आमच्या डोक्यावर काळ बनून बसलेला असतो. असं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलं. इर्शाळवाडीसारख्या दुर्घटनेला सामोरं जाण्याआधी आमचं कायमचं पूनर्वसन करा, असं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

41 गावं दरड प्रवण क्षेत्रात

सातारा जिल्ह्यात सुमारे 41 गावं दरड प्रवण क्षेत्रात येतात. त्यातीलच मोरेवाडी हे गाव आहे. इर्शाळवाडी घटनेनंतर सातारा प्रशासन अलर्ट झालंय. मोरेवाडीतील ग्रामस्थ भयभित आहेत. मात्र या ग्रामस्थांच कायमस्वरुपी पुनर्वसन कधी होणार ग्रामस्थांच्या मागणीला प्रशासन कधी साद देणार हे पाहाणं‌ महत्वाचं‌ असणार आहे.