Vijay Varma | “त्यानंतर 7-8 वर्षे आम्ही एकमेकांशी बोललोच नाही”; वडिलांबद्दल सांगताना विजयला अश्रू अनावर

| Updated on: Aug 26, 2023 | 3:58 PM

विजयने आता फिल्म इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केल्यानंतर त्यांच्या नात्यातील हा दुरावा काही प्रमाणात कमी झाला आहे. आता वडील नेहमी विविध रेसिपी, भजन, बातम्या आणि गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवत असल्याचं विजयने हसत सांगितलं.

Vijay Varma | त्यानंतर 7-8 वर्षे आम्ही एकमेकांशी बोललोच नाही; वडिलांबद्दल सांगताना विजयला अश्रू अनावर
Vijay Varma
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : अभिनेता विजय वर्मा ‘गली बॉय’, ‘दडाड’, ‘डार्लिंग्ज’, ‘कालाकूट’ यांसारख्या चित्रपटांमधील दमदार भूमिकांसाठी ओळखला जातो. त्याने इतरही काही चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सध्याच्या काळातील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये त्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. पण इंडस्ट्रीत इथवर पोहोचण्यासाठी विजयला त्याच्या आयुष्यात बराच त्याग करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो पहिल्यांदाच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल व्यक्त झाला. वडिलांनी फिल्म इंडस्ट्रीतील करिअरला परवागनी न दिल्याने विजय घरातून पळाला होता.

विजयने FTII मधून शिक्षण पूर्ण केलं. अभिनयाप्रती प्रचंड आवड असलेल्या विजयच्या या करिअरला मात्र त्याच्या वडिलांचा स्पष्ट विरोध होता. अखेर आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्याला घरातून पळून जावं लागलं. या मुलाखतीत विजय त्याच्या वडिलांसोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. “मी जेव्हा लहान होतो, तेव्हा आमच्यात खूप प्रेम होतं. हळूहळू जसा मोठा होत गेलो, तसतसे माझे वडील माझ्यासाठी हिरो बनले. ते माझी प्रत्येक मागणी पूर्ण करायचे. मी घरात सर्वांत लहान असल्याने, माझे सर्व लाड पुरवले जायचे. पण जेव्हा माझ्या करिअरची निवड करण्याची वेळ आली आणि माझे विचार त्यांच्यापासून वेगळे जाणवू लागले, तेव्हा त्यांना ते आवडलं नाही”, असं तो म्हणाला.

हे सुद्धा वाचा

विजयच्या वडिलांचा हैदराबादमध्ये हस्तकलेचा व्यवसाय होता आणि विजयने त्यात मदत करावी अशी त्यांची इच्छा होती. याविषयी त्याने पुढे सांगितलं, “मी त्यांचा बिझनेस पुढे न्यावा अशी त्यांची अपेक्षा होती. पण मला ते काम करायचं नव्हतं. त्यामुळे तेव्हापासून आमच्यात मतभेद सुरू झाले. ते त्यांच्या निर्णयावर खूप ठाम होते आणि मी माझ्या निर्णयासाठी लढत होतो. हा वाद बरीच वर्षे पुढे चालला आणि अखेर मी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सात ते आठ वर्षे आम्ही एकमेकांशी बोललोसुद्धा नाही.”

विजयने आता फिल्म इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केल्यानंतर त्यांच्या नात्यातील हा दुरावा काही प्रमाणात कमी झाला आहे. आता वडील नेहमी विविध रेसिपी, भजन, बातम्या आणि गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवत असल्याचं विजयने हसत सांगितलं.