Sunny Deol | ‘गदर 2’च्या प्रचंड यशानंतर सनी देओलने वाढवली फी? आता 8 कोटी नाही तर..

| Updated on: Aug 28, 2023 | 10:31 AM

सनी देओलला बऱ्याच वर्षांनंतर बॉक्स ऑफिसवर एवढं मोठं यश मिळालं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'गदर 2'चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितलं की, "प्रदर्शनाच्या दिवशी प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून सनीला अश्रू अनावर झाले होते."

Sunny Deol | गदर 2च्या प्रचंड यशानंतर सनी देओलने वाढवली फी? आता 8 कोटी नाही तर..
Sunny Deol
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : अभिनेता सनी देओलने तब्बल 22 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. त्याच्या ‘गदर 2’ चित्रपटाने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 16 दिवसांत तब्बल 438 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर प्रदर्शनानंतर 13 दिवसांतच ‘गदर 2’ने कमाईचा 400 कोटींचा टप्पा पार केला होता. वयाची साठी ओलांडलेल्या सनी देओलने ही दमदार कामगिरी केली आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर आता त्याने आपली फी वाढवल्याची माहिती समोर येत आहे. याआधी सनी देओल एका चित्रपटासाठी जवळपास सात ते आठ कोटी रुपये मानधन घ्यायचा.

‘गदर 2’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता ‘बॉर्डर 2’, ‘अपने 2’ आणि ‘माँ तुझे सलाम 2’ यांसारख्या सीक्वेलची चर्चा होऊ लागली आहे. तर दुसरीकडे गदरच्या तिसऱ्या भागाबद्दलही जोरदार चर्चा आहे. यादरम्यान स्वयंघोषित चित्रपट समिक्षक कमाल आर. खानने सनी देओलबद्दल एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्याने लिहिलं, ‘एका निर्मात्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी सनी देओलची नुकतीच भेट घेतली आहे. यावेळी सनीने त्या प्रोजेक्टसाठी तब्बल 50 कोटी रुपयांचं मानधन मागितलं आहे.’ केआरकेच्या या ट्विटनंतर सनी देओलने त्याची फी वाढवल्याचं म्हटलं जात आहे.

सनी देओलला बऱ्याच वर्षांनंतर बॉक्स ऑफिसवर एवढं मोठं यश मिळालं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘गदर 2’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितलं की, “प्रदर्शनाच्या दिवशी प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून सनीला अश्रू अनावर झाले होते. मी त्याला पहिल्यांदा रडताना ऐकलं होतं. तो म्हणाला, शर्माजी.. आपण करून दाखवलं. सनी देओलला फोनवर रडताना ऐकून माझे आणि माझ्या पत्नीचेही डोळे पाणावले होते. तो क्षण खूप भावनिक होता.”

हे सुद्धा वाचा

पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर स्वातंत्र्यदिनी तब्बल 55 कोटी रुपयांची कमाई झाली होती. आतापर्यंत या चित्रपटाने देशभरात जवळपास 430 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर हा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.